Saturday, 31 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:५४

 आति तिथे माती - 

images%2B%252822%2529


आति तिथे माती

            एक गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर  पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.

       देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला 'तुला काय हवे ते मग'भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या .देव म्हणाला 'मोहरा कशात घेणार?"  भिकाऱ्याने झोळी पुढे केली.मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव  म्हणाला'मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.

       पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल .भिकाऱ्याने जेव्हा अट अमान्य केली .देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू  लागला  हळूहळू   झोळी भारत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना.
       
       मोहरांच्या वजनाने झोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता .शेवटी जे व्हायचे तेच झाले.त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.

         त्याच्याबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरात नाही.आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो.

  तात्पर्य  - कोणत्याही गोष्टीचा आति लोभ करू नये.  

Friday, 30 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:५३

 गरज सरो, वैद्य मरो - 

nature-4431020_960_720

गरज सरो, वैद्य मरो


 एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला. तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना. शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली. तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून बरे करा. तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन. वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि त्या श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला. वैद्याला म्हणाला, "वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना! अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का? माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही असेल. पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते'. त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही.

तात्पर्य : जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात. गरज सरली, की सोयीस्करपणे बदलतात.

Thursday, 29 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:५२

 दोन मित्र - 

images%2B%25287%2529

दोन मित्र

दोन मित्र होते. एक फारच धार्मिक वृत्तीचा होता. तो नेहमी देवपूजा, जप यात मग्‍न असायचा तर दुसरा त्‍याचे विरूद्ध टोक होता. तो कधीच मंदिरात जात नसे, घरीही पूजाअर्चा करत नसे. दान-पुण्‍यपाप यावर त्‍याचा विश्‍वास नव्‍हता. त्‍याने जीवनात अधिक पैसे मिळविण्‍याचे ठरविले होते. तो रात्रंदिवस पैसे कमावण्‍यात गुंग झाला होता. भौतिक सुविधांनी त्‍याने आपले जीवन संपन्‍न बनविले होते. पण त्‍याच्‍या जीवनात सुख व संतोष हे नावाला सुद्धा नव्‍हते. याउलट आस्तिक मित्र आपल्‍या गरीबीतच सुखी,समाधानी होता. तो तुटपुंज्‍या साधनातच समाधानी राहत असे. नेहमी ईश्र्वरभक्तीत रममाण होता. एके दिवशी नास्तिक मित्र त्‍याला भेटायला त्‍याच्‍या घरी आला व त्‍याचे साधे घर पाहून तो म्‍हणाला,''तुझ्या त्‍यागाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. तू तर ईश्र्वरभक्तीमध्‍ये सा-या जगाला सोडून दिलेस मात्र तरीही खुश आहेस'' हे ऐकून आस्तिक मित्र म्‍हणाला,''मित्रा, मी आपल्‍या गरीबीत फार आनंदी आहे, पण तुझा त्‍याग तर माझ्यापेक्षाही मोठा आहे कारण तू तर पैशासाठी, सुखसोयीसाठी ईश्र्वरालाच त्‍यागले आहेस, तूच सांग तू खुश आहेस ना'' आपल्‍या मित्राचे हे बोलणे नास्तिक मित्राच्‍या जिव्‍हारी लागले. त्‍याने विचार केला की आपण हे सर्व धन मिळवतो पण आपल्‍याला सुख का लागत नाहीये, समाधान का मिळत नाही. पण गरीब असणारा आस्तिक मित्र मात्र सुखात आहे, आनंदात आहे याचे कारण त्‍याला कळाले. त्‍या दिवसापासून त्‍याच्‍या जीवनाची दिशाच बदलून गेली.

तात्‍पर्य- जीवनात अनेक गोष्‍टी अनुकुल प्रतिकुल बनविणारी कोणीतरी सत्ता ही मानवाला मानावीच लागते. त्‍याची आठवणसुद्धा काहीवेळा मनाला सूचक अशा सूचना देऊन आपले वर्तन बदलण्‍यास मदत करते.

Wednesday, 28 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:५१

 ओळखा पाहू - Marathi Goshti


nature-4431020_960_720


ओळखा पाहू


 एक फकीर रस्‍त्‍याने चालले होते. रस्‍त्‍यात त्‍यांना एक व्‍यापारी गाठ पडला, व्‍यापा-याबरोबर पाच गाढवे होती आणि पाचही गाढवांवर पाच मोठमोठी गाठोडी लादलेली होती. गाढवे त्‍या गाठोड्यांच्‍या ओझ्याने अगदी दबून गेली होती. फकीराने व्‍यापा-याला विचारले,'' या गाठोड्यात असे तुम्‍ही काय नेत आहात की ज्‍याच्‍या वजनाने तुमची गाढवे अगदी दमून, दबून गेलेली दिसत आहेत'' व्‍यापा-याने उत्‍तर दिले,'' यात माणसाच्‍या वापराच्‍या अनमोल गोष्‍टी आहेत. मी त्‍या गोष्‍टी बाजारात विकण्‍यास निघालो आहे.'' फकीराने विचारले,'' अच्‍छा, अशा कोणकोणत्‍या गोष्‍टी तुम्‍ही विकता ते तरी सांगा'' व्‍यापारी म्‍हणाला, '' पहिल्‍या गाढवाकडे जाऊ, त्‍याच्‍या पाठीवर ठेवलेल्‍या गाठोडयात अत्‍याचार भरलेले आहेत. ज्‍यांची खरेदी ही राजा-सत्ताधारी लोक, वरीष्‍ठ लोक करतात. खूप मोठ्या भावाने हे विकले जातात.'' मग व्‍यापारी दुस-या गाठोड्याकडे वळाला आणि सांगू लागला,'' या गाठोड्यात अहंकार भरला आहे. याची खरेदी ही उच्‍चशिक्षित, उच्‍चभ्रु, विद्वान माणसे करतात.'' तिस-या गाठोड्याला हात लावून व्‍यापारी म्‍हणाला,'' यात ईर्षा भरली आहे. याचे ग्राहक आहेत ते म्‍हणजे धनवान लोक जे दुस-याची प्रगती कधीच पाहू शकत नाहीत. याच्‍या खरेदीसाठी अक्षरश: लोकांच्‍या उड्या पडतात.'' फकीर म्‍हणाला,'' चौथ्‍या गाठोडयात काय आहे'' व्‍यापारी म्‍हणाला,'' यात बेईमानी भरून आणली आहे आणि याचे गि-हाईक म्‍हणजे धंदेवाईक लोक, उद्योगप‍ती लोक जे आपल्‍या फायद्यासाठी ग्राहकांच्‍या जीवाशी खेळतात आणि भेसळ करून लहानमोठ्यांना प्राण गमाविण्‍यास भाग पाडतात. यालासुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे.'' फकीर अचंबित होऊन पाहत असतानाच व्‍यापारी शेवटच्‍या गाढवाकडे जाऊन म्‍हणाला,'' या शेवटच्‍या गाढवावर मी कट-कारस्‍थान भरून आणले आहे. आजकाल सर्वच जण कटकारस्‍थान करून दुस-याला कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतो म्‍हणून यालाही मागणी भरपूर आहे.'' एवढे बोलून व्‍यापारी काही अंतर निघून पुढे गेला व फकीर त्‍याच्‍या जाणा-या आकृतीकडे पाहतच राहिला

तात्‍पर्य- कथेचे आता वेगळे तात्‍पर्य काय सांगावे, तुम्‍ही ते जाणले असालच. तुमचे मत कृपया कॉमेंट मध्ये नोंदवा.

Tuesday, 27 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक ५०

 संघर्षच खरे जीवन - 

images%2B%252810%2529


संघर्षच खरे जीवन


 एका गावात एक म्‍हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्‍हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्‍यातरी आजाराने ग्रस्‍त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्‍हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्‍हातारी स्‍वाभिमानी असल्‍याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्‍या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्‍याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्‍हणायला आणि मृत्‍युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्‍यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्‍हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्‍यु समोर पाहून म्‍हातारी घाबरली आणि म्‍हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्‍हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्‍यूदेव निघून गेले आणि म्‍हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.

तात्‍पर्य- जीवनापासून पळ काढणे म्‍हणजे समस्‍येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत रा‍हणे, आपले नित्‍यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.

Monday, 26 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४९

 वेडे सांबर - 

images


वेडे सांबर


 एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''

तात्पर्य =जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!

Sunday, 25 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४८

 लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी - 


images%2B%25282%2529

लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी


एका मुसलमानाचा घरी एका हाऱ्यात काही कोंबडीं ठेवली होती. त्यातली काही कोंबडीं फार लठ्ठ होती व काही अगदी बारीक होती. जी लठ्ठ होती, ती त्या बारीक कोंबडयांची, त्यांच्या अशक्ततेबद्दल वरचेवर थट्टा करून त्यास हिणवीत असत.

शेवटी, एके दिवशी त्या मुसलमानच्या घरी मेजवानी होती, तेव्हा त्याने आपल्या नोकरास आज्ञा केली की, ‘ह्या कोंबडयांत जी लठ्ठ असतील त्यांस मारून त्यांची कढी करा. ’ त्याप्रमाणे, नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडयांस ठार मारू लागले तेव्हा ती आपल्या मनात म्हणतात, ‘आम्ही जर त्या दुसऱ्या कोंबडयांसारखी बारीक असतो, तर हा प्रसंग आमच्यावर आज खचित आला नसता. ’

तात्पर्य:- संपत्तीमुळे मनुष्यास गर्व येतो; परंतु जेव्हा लूट होते आणि दरोडे पडतात तेव्हा तीच संपत्ति दुःखास कारण होते.

Saturday, 24 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४७

 गरुड आणि घुबड

download%2B%25283%2529


एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’

पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’

 तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

Friday, 23 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक;४६

 चतुर राजा -chatur raja

download%2B%25287%2529


        खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा बनारसचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून त्याचे राज्यही कबजा करतो  . युद्धातून आणलेली सर्व  संपत्ती तो पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या आपल्या बागेत पुरून टाकतो. या युद्धाच्या धामधुमीत पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून घेतो आणि तो तेथून पळून जातो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते.

        राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात. बनारसचा राजा त्याचे तेज:पुंज रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो त्याला राजेशाही वागणूक देतो.

         तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. तो त्याला राजवाड्याच्या आवारातील बागेत सापडतो, लवकरच ते  सारे  धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते. त्याला खूप दु:ख होते.

        तेव्हा त्याचा  प्रधान त्याला म्हणतो महाराज आपण का दु:खी होता, जी संपत्ती तुमची कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात? बनारसच्या राजाला सत्य उमगते. राजा दुखातून बाहेर पडतो. 

तात्पर्य - करावे तसे भरावे.

Thursday, 22 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४५

 संगत

nature-4431020_960_720



एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले.
 गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत.
 मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना.
 शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या.
 गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती.
 त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!

तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.

Wednesday, 21 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४४

 दोघे मुलगे आणि दुकानदार - Marathi Story for Kids

images%2B%25289%2529


दोघे मुलगे आणि दुकानदार

दोन तरुण मुलगे एका फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून, त्यापैकी एकाने एक लाडू चोरला आणि तो दुसऱ्याकडे दिला. त्याने तो आपल्या खिशात लपविला. लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला, ‘तुमच्याशिवाय माझा लाडू कोणी चोरला नाही.’ हे ऐकताच, ज्याने लाडू चोरला होता, तो म्हणतो, ‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’

ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणतो, ‘मीही शपथ घेऊन सांगतो की, मी काही तुमचा लाडू चोरला नाही.’ दुकानदार म्हणाला, ‘तुम्हा दोघापैकी कोणी लाडू चोरला, हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकी एक असामी चोर असून, तुम्ही दोघेही लबाड आहात, हे मी अगदी खात्रीने सांगतो.’

तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे.

Tuesday, 20 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४३

 दुकानदार आणि हत्ती


pexels-photo-2752372

        एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला 
खाऊ घालत असत.सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्यला जीव लावत असे.

         हत्ती रोज साकळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फुले सोंडेत घेऊन  मिरवत-मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्याप्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत.लोक हत्तीचे कैतुक करत असे.  हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता.

         एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयी प्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्यावजी त्यच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदारने  कारण नसतानाही स्वताचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखवला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला.

        आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढयाच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले.

        हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला .हत्तीने ते घाणरडे पाणी दुकानदार , फुले आणि हरांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला. त्याला स्वताची चूक कळून आली. मात्र त्यसाठी त्याला मोठी किमंत मोजावी लागली.

तात्पर्य - जसाच तसे.

Monday, 19 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४२

 घोडा आणि नदी - Marathi Goshti

download%2B%252820%2529


घोडा आणि नदी

एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.

मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".

मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.

कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."

उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....

Sunday, 18 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४१

 बहिरी ससाणा,कासव आणि सिंह

images%2B%25283%2529


           खूप वर्षापूर्वी, जंगलात एका झाडावर बहिरी ससाणा हा पक्षी आणि त्याचे कुटुंब राहत असते. त्यांची जंगलातल्या प्राण्यांशी विशेषत: कासव सिंह आणि पाणकावळा  ह्या सर्वांशी त्याची छानच मैत्री होते.

         एक दिवस एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी येतो. तो ससाण्याच्या पिल्लाला झाडावर पाहतो. ससाण्याचे  मांस खाण्याची इच्छा शिकाऱ्याची होते . त्याची शिकार करण्याचे तो ठरवतो. त्यासाठी शिकारी आग पेटवितो. हे सगळे दृश्य त्या पिलाची आई पाहते असते. ती पतीला सांगते कि, ' आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलवा नाही तर शिकारी आपल्या पिल्लाला खाऊन टाकेल. 

        ससाणा लगेचच मित्रांना बोलवायला जातो. त्याचे मित्र कासव, सिंह, पाणकावळा लगेचच त्याच्या मदतीसाठी निघतात.  पाणकावळा शिकाऱ्याने केलेला जाळ पाहतो आणि त्याच्यावर चोचीने पाणी शिंपडतो. कासव त्यावर वाळू टाकून आग विझवतो. सिंह मोठ्याने गर्जना करतो.

        सिंहाची गर्जना ऐकून शिकारी घाबरून पळून जातो. ससाणा त्याच्या मित्राने वेळेवर मदत केल्याने त्यांचे आभार मानतो. पुढे ते सगळे आनंदाने राहू लागतात.

तात्पर्य -संकट काळी जो मदत करेल तोच खरा मित्र .

Saturday, 17 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:४०

 मांजराच्या गळ्यात घंटा

images%2B%252826%2529


एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.
हा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.
सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.
सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुषारीचा फार अभिमान वाटला.
तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.

उपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो.