Friday, 16 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३९

 animals-2028364_960_720



एक शेतकऱ्याचा एक कोंबडा होता, त्यास एके दिवशी असे समजले की, ‘आज आपला धनी आपणास मारून खाणार.’ मग तो आपण शेतकर्‍याच्या हाती न सापडावे म्हणून इकडेतिकडे लपून बसू लागला.

आपल्या बरोबरीच्या कोंबडयांच्या माना कापताना आपल्या धन्यास त्याने पुष्कळ वेळा पाहिले होते व तेव्हापासून त्याला मोठी दहशत बसली होती. त्याला जवळ बोलावून त्याची मान कापावी, या हेतूने त्या शेतकऱ्याने पुष्कळ गोड शब्द बोलून व धान्य दाखवून त्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कोंबदा पूर्वीच सगळे जाणून असल्यामुळे, त्याच्या गोड बोलण्यास भुलून फसला नाही.

जवळच एका पिंजर्‍यात त्या शेतकर्‍याचा बहिरी ससाणा होता, त्याने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तो कोंबडयास म्हणतो, ‘अरे, तू किती मूर्ख आणि कृतघ्न आहेस ! आपल्या धन्याने मारलेली हाक ऐकल्याबरोबर त्याच्याजवळ जाऊन तो काय म्हणतो ते ऐकून घेणे हे तुझे कर्तव्य नाही काय ? या बाबतीत माझे वर्तन कसे आहे, हे लक्षात घे. मला दुसरी हाक मारण्याचा प्रसंग आपल्या धन्यास मी कधीही येऊ देत नाही, हे तू पाहिलेच आहेस.’

कोंबडा उत्तर करतो, ‘खरेच ! पण मजप्रमाणे तुझी मान सुरीने कापून, तुझ्या मांसाचे तुकडे तव्यावर भाजून खावे, या उद्देशाने जर धन्याने तुला जवळ बोलाविले, तर तू मजप्रमाणेच लपून बसशील, याबद्दल मला बिलकुल संशय वाटत नाही. ’

तात्पर्य: परिस्थितीप्रमाणे मनुष्याच्या वर्तनात बदल व्हावा हे साहजिकच आहे। 

No comments:

Post a Comment