Monday, 30 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८५

 आई ती आई-

download%2B%252817%2529


मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्‍या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?' हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.'
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं.
महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?' त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, 'हे बालक या बाईचंच आहे. 'त्याला कापण्यात यावं, 'असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.'
अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

Saturday, 28 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८४

 मातेचा उपदेश-


 एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे?
 नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.

तात्पर्य : जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्‌गुणांची जोड द्यावी लागते.

उपक्रम: कथा क्रमांक:८३

 सुभेदार आणि त्याचा घोडा- 

images%2B%252824%2529


सुभेदार आणि त्याचा घोडा

एका सुभेदाराचा घोडा फार देखणा आणि चपळ होता; पण त्यापेक्षां दुसरा एक कमी प्रतीचा घोडा त्याने विकत घेतला आणि त्याचे लाड करण्यात आणि त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवण्यातच आपला बहुतेक वेळ घालवू लागला.
       एके दिवशी हा दुसरा घोडा पहिल्या घोडयास म्हणाला, ‘दादा, तू इतका सुंदर, मजबूत आणि चपळ असता, तुजकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात आमच्या धन्यास इतका आनंद वाटतो, याचे कारण काय असावे बरे ?’ पहिला घोडा उत्तर करितो, ‘कोणतीही वस्तू नवी असली, म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व ती अंमळ जुनी झाली की तिजकडे दुर्लक्ष करून नव्या वस्तूच्या नादीं लागावयाचें, हा सर्वसाधारण मनुष्यस्वभाव आहे. हल्ली आपला धनी तुझे फार लाड करतो आहे, पण थोडयाच दिवसांत, मजप्रमाणे तूही त्यास अप्रिय होऊन, तुझ्या जागी नवा घोडा येईल, याबद्दल तुझी खात्री असू दे. ’

तात्पर्य:- ‘वस्तू वाटे नवी जो अवड बहु तिची लोकरीती अशी हे. ’

Friday, 27 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८२

 लोभी विक्रेता - 

images%2B%25288%2529

लोभी  विक्रेता

   एकदा एक व्यापारी आपल्या वस्तू विकायला गावात येतो. त्या गावात एक लहान मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. तिला कानात घालण्यासाठी कानातले घ्यायचे असते. पण तिच्याकडे पैसेच नसतात. ती आपल्या आजीला सांगते कि आपण आपली जुनी ताट विकून मला कानातले घेऊयात का? आजी तयार होते. आजी तिच्याकडे एक ताट देते.
        ती लहान मुलगी ते ताट घेऊन व्यापाऱ्याकडे जाते. व्य्पारी ते ताट नित निरखून पाहतो. त्याला समजते हे ताट सोन्याचे आहे. पण तो मुलीला ते सांगत नाही. उलट तो तिला म्हणतो  या ताटाला काहीच किंमत मिळणार नाही. मुलगी नाराज होते.
त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो.
          थोड्या  दिवसांनी दुसरा एक विक्रेता येतो. त्या मुलीला पुन्हा  कानात घालण्यासाठी कानातले घ्यायच्या असतात. तिची आजी पुन्हा तेच ते ताट त्या दुसर्या विक्रेत्याला दाखवते. तो त्या आजीला सांगतो कि, आजी हे ताट सोन्याचे आहे. आजीला आश्चर्य वाटते. तो विक्रेता त्या ताटाच्या मोबदल्यात त्यांना त्याच्याकडील सर्व वस्तू देऊन टाकतो.
        थोड्या दिवसांनी पुन्हा तो हावरट, लोभी दुकानदार येतो. ताटाबद्दल चौकशी करतो. आजी चांगलीच भडकते. खरा प्रकार लक्षात आल्यावर तो पळून जातो.

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे.

Thursday, 26 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८१

 अख्खी म्हैस पाच रुपयात- 

download%2B%252819%2529


अख्खी म्हैस पाच रुपयात

एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, 'आपली म्हैस गावातल्याच दोन-तीन चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता चार दोन दिवसात म्हैस-चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळविण्याची काहीतरी युक्ती काढली पाहिजे.'
मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली, 'ऎका हो ऎका ! दररोज पंधरा शेर दूध देणारी माझी तरणीबांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देणार्‍यास मी ती म्हैस अवघ्या पाच रुपयात विकत देईन.'ज्याने ती म्हैस चोरली होती, त्याच्या कानी ती दवंडी गेली.
तो मनात म्हणाला, 'आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल, आणि वर अब्रुही जाईल. त्यापेक्षा 'तुझी म्हैस मला रानात मिळाली,' असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव, आणि त्याला पाच रुपये देऊन, म्हशीला खरेदी करुन घरी घेऊन यावं.' असा विचार करुन त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून, त्याला पाच रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले.
यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, 'माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला पाच रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे.चोरटा म्हणाला, 'ठिक आहे. त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर पाच-सहा रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची ?'म्हशीचा मालक म्हणाला, 'छे छे ! साखळदंडाची किंमत आहे नऊशे पंच्चाण्णव रुपये.'म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून, तो चोरटा हात चोळीत तिथून चूपचाप निघून गेला.

Wednesday, 25 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८०

 

गणपति - 


बालमित्रांनो, गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी ‘चिंतामणी‘ हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.

कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळयांना त्रास देत होता. ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करत होता. एकदा तो आपल्या साथीदारांसह रानात शिकारीस गेला. त्याच रानात कपिलमुनींचा आश्रम होता. त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांसह जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. कपिलमुनींची झोपडी (आश्रम) पाहून कणाला हसू आले.
तो म्हणाला, ”तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार ?” त्यावर कपिलमुनींनी आपल्या गळयात साखळीला लावलेला ‘चिंतामणी’ काढून तो एका चौरंगावर ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे तेथे एक जेवणघर निर्माण झाले. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट आणि चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून संतुष्ट झाले.
कणाला तो मणी प्राप्त करण्याची आशा झाली. त्याने आपली इच्छा कपिलमुनींकडे व्यक्त केली; परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिलमुनींनी त्यास नकार दिला. त्यावर त्याने अत्याचाराने तो मणी हिरावून घेतला.
त्यानंतर कपिलमुनींनी गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले. इकडे त्या मण्यासाठी कपिलमुनी आपल्याशी युद्ध करतील, असा ग्रह करून कण कपिलमुनींवर चाल करून गेला. गणपतीच्या कृपेने त्या रानात फार मोठे सैन्य निर्माण झाले. त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले. तेव्हा गणपति स्वत: रणांगणावर आला. त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केला; पण गणपतीने ते हवेतच आपल्या बाणांनी अडवले. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. कणाचे वडील राजा अभिजीतने रणांगणावर येऊन गणपतीला नमस्कार केला. कपिलमुनींचा ‘चिंतामणी’ त्यांना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सदगती द्यावी, अशी अभिजीतने गणपतीला विनवणी केली. दयाळू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले.

गणपतीने कपिलमुनींना चिंतामणी परत मिळवून दिला; म्हणून गणपतीला ‘चिंतामणी’ असे नाव पडले.

Tuesday, 24 November 2020

उपक्रम:कथा क्रमांक:७९

 

दोघे वाटसरू आणि अस्वल - 


दोन गृहस्थ जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी आपसांत असा ठराव केला की, प्रवासात जर एखादयावर काही संकट आले, तर दुसऱ्याने त्यास मदत करावी. पुढे ते एका अरण्यांतून जात असता, एक अस्वल त्यांच्या अंगावर धावून आला.
    त्यावेळी त्यापैकी एकजण चपळ होता, तो झटकन एका झाडावर चढून बसला. जड अंगाचा होता, त्याच्याने पळवेना; तेव्हा तो आपला श्र्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन भुईवर पडला. अस्वलाने त्याजजवळ येऊन त्याच्या कानाशी हुंगून पाहिले आणि हे प्रेत आहे असे समजून, त्यास काही उपद्रव न करता, तो निघून गेला.
    अस्वल गेल्यावर झाडावरील गृहस्थ खाली उतरून आपल्या सोबत्यात हसत विचारतो, ‘मित्रा, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ?’ त्याच्या सोबत्याने उत्तर केले, ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लुच्चाच्या शब्दावर पुनः विश्वास ठेवू नकोस.’

तात्पर्य:- सर्व काही ठीक चालले आहे, अशा वेळी पुष्कळ लोक ममता दाखवितात आणि भरंवशाची भाषणे करतात, परंतु संकट प्राप्त झाले म्हणजे जो तो स्वतःचा बचाव करतो. दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा विरळा.

Monday, 23 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७८

 

ओले हात - 

एकदा जपानच्या बादशहाने आपल्या राजसभागृहात, आपल्या राज्यातील सर्व लहान- मोठया अधिकार्‍यांची सभा घेतली. सभेला उद्देशून तो म्हणाला, ' मी लोकांच्या कल्याणासाठी, आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडोपाड्यांसाठीही वर्षानुवर्षे एवढा पैसा खर्च करीत असताना, राज्याचा कायापालट का होत नाही ? बघावं, तर प्रजा त्याच दारिद्रयात, त्याच अज्ञानात व त्याच रोगराईत खितपत पडली आहे. हे असं का व्हावं ?'
    बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहिना. अखेर स्पष्टवक्तेपणा व निस्पृहता या गुणांविषयी प्रसिध्द असलेल्या विंगचॅंग या आधिकार्‍याकडे बादशहानं आपली प्रश्नार्थक नजर वळविली. तेव्हा विंगचॅंग याने प्रथम सेवकाकरवी बर्फाचा एक नारळाएवढा मोठा गोळा मागवून घेतला व तो बादशहाच्या हाती देऊन तो त्याला म्हणाला, 'महाराज ! हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे, पाहिलंत ना ? आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुध्द बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहातो. आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिकार्‍याकडून मागल्या रांगेतल्या अधिकार्‍याकडे, त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिकार्‍याकडे याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा, मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो.'बादशहाने त्याप्रमाणे केले.
    त्याने तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंत्र्याच्या हाती दिला. मंत्र्याने तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक कारभार्‍याच्या हाती दिला. त्याने तो मागल्या रांगेतील जिल्हाधिकार्‍याकडे, त्याने त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हाधीकार्‍याकडे, त्याने त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे, असं होता होता, जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिकार्‍याचे हात ओले करीत करीत, सर्वांत मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचॅंगच्या हाती गेला, तेव्हा त्याचा आकार सुपारीएवढा होऊन गेला होता !
    तो सुपारीएवढा खडा हाती येताच, तो स्पष्टवक्तेपणा व सचोटी याविषयी प्रसिध्द असलेला विंगचॅंग बादशहाकडे धावत गेला व तो खडा त्याला दाखवून म्हणाला, 'महाराज, आपण मंत्र्याच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता, आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला, हे प्रत्यक्ष पाहिलंच ना ? तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागातील लोककल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठया रकमा मंजूर करता, आणि इथून पाठवूनही देता. पण ती रक्कम त्या भागात पोहोचती होईपर्यंत प्रत्येक अधिकारी आपले हात 'ओले ' करुन घेतो आणि प्रत्यक्षात राज्याच्या त्या त्या विभागाच्या विकासासाठी नाममात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे रहतो. मग राज्याचा कायापालट व्हावा कसा ? आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा ?'

Sunday, 22 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७७

 

चांगला  माणूस आणि दृष्ट माणूस


        एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा  व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. पण एक दृष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून  टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसर्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दृष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो. तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो .
    चांगल्या माणसाच्या लक्षात येते कि आपण लावलेला दिवा कोणीतरी येवून विझवून जात आहे. मग तो माणूस विचार करतो कि आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही.
     एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पुजा करण्यासाठी मंदिरात जात नाही  पण दृष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो  आणि दृष्ट माणसाला  देव प्रसन्न होतो . कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो .

तात्पर्य  - नित्यनेमेने काम केल्यास फळ मिळते .

Saturday, 21 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७६

 

दळणाचे जाते आणि खजिना -  


राजा भीमसेन याला आपल्‍या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्‍याला त्‍याचा मित्र समशेर भेटण्‍यासाठी म्‍हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्‍वागत केले. त्‍याचा यथायोग्‍य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्‍याला आपला महाल पाहण्‍यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्‍या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्‍यास सुरुवात केली. सर्वत्र त्‍याच्‍या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्‍यावर राजाने शेवट त्‍याला आपल्‍या खजिन्‍याच्‍या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्‍याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्‍ने, अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्‍तू कशा मी जमा केल्‍या आहेत. या खजिन्‍याच्‍या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्‍याचे राजाच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्‍हणाला,’’मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही’’ राजा म्‍हणाला,’’ अरे मित्रा, इतक्‍या बहुमूल्‍य अशा खजिन्‍याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.’’ यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्‍यावर धान्‍य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्‍हणाला,’’ राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्‍यात तू जी रत्‍ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्‍या रत्‍नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्‍या जात्‍याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्‍य दळून घेऊन जातात. तू ज्‍यांना रत्‍नांच्‍या पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्‍यांच्‍या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्‍यातून निघणा-या पीठामधून. म्‍हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्‍यापेक्षा, राज्‍यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्‍ठ वाटली.’’ राजाला आपली चूक कळाली व त्‍याची घमेंड पूर्ण उतरून गेली.

तात्‍पर्य :- ज्‍या गोष्‍टीने मानव समाजाचे कल्‍याण होत असेल अशा गोष्‍टी करणे हितकर असते. मनुष्‍यजन्‍मात येऊन जर इतरांचे हित पाहता येत नसेल तर असा मनुष्‍यजन्‍म काय कामाचा.

Friday, 20 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७५

 

संत राबिया आणि चोर - 

download%2B%25282%2529


संत राबियाची ईश्‍वरभक्‍ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्‍वराचे स्‍मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्‍वरनिर्मिती मानून त्‍यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्‍त असताना तिच्‍या घरात चोर घुसला. त्‍याला राबियाच्‍या घरी धन तर सापडणार नव्‍हते. त्‍याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. 
    त्‍याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन    तो जात असताना त्‍याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, 
त्‍याने डोळे चोळून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याचा काहीच फायदा झाला नाही. त्‍याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्‍याला थोपटून पाहिले. तेव्‍हा त्‍याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्‍हा पुन्‍हा त्‍याची तीच अवस्‍थ झाली. 
   चादर खाली ठेवली की त्‍याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्‍हा त्‍याला कोणीतरी म्‍हटल्‍याचा भास झाला,’’ तू स्‍वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्‍वत:चे अस्तित्‍व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्‍हा एक मित्र झोपतो तेव्‍हा दुसरा जागा असतो. मग त्‍याची कोणतीही वस्‍तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्‍त असलेल्‍या राबियाचे चरणस्‍पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.

तात्‍पर्य :-ईश्‍वराशी आपण एकरूप झालो की ईश्‍वरही आपली मनापासून काळजी करतो.

Thursday, 19 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७४

 

खरा वेडा कोण - - Khara Veda Kon Marathi Story



एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. 
त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. 
त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई.
 वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई.
     एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. 
अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली.
       हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. 
        त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''

Wednesday, 18 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७३

 

हुशार लांडगा - 

images%2B%25281%2529


एका गावातील काही लोकांनी मिळून ठरवले कि दुपारी जंगलात फिरायला जायचे म्हणून. जंगलात जाताना सर्वजण आपले जेवणाचे डबे घेऊन जातात. संपूर्ण जंगल फिरून झाल्यावर ते खूप दमतात त्यांना भूक लागते मग त्यांनी आपल्या बरोबर आणलेल्या पदार्थावर तुटून पडतात.
आगोदरच दमलेले त्यात जेवण भरपूर झालेले, त्यामुळे ते लगेच झोपी जातात. झोपेतून उठतात तेव्हा खूप रात्र झालेली असते पुन्हा त्यांनी पुन्हा भूक लागते.
त्यातला एकजण म्हणतो, 'तुम्ही शेकोटी पेटवा तोवर मी आपल्याला काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो'. तो हातात एक जाड काठी घेऊन जवळच्या एका तलावाशेजारील झाडामागे जाऊन लपतो. रात्रीचे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची वाट पाहतो. तो त्या झाडाखाली बसतो आणि झोपण्याचे नाटक करतो.
   थोड्यावेळाने पाणी पिण्यासाठी एका लांडग्यांचा कळप येतो. ते त्या झोपलेल्या माणसाला पाहतात. त्या कळपाचा नेता खूप हुशार असतो. तो इतरांना सांगतो की तो माणूस झोपण्याचे नाटक करत आहे.
तो पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांना पकडण्याची संधी शोधत आहे. आपले म्हणणे खरे करून दाखविण्यासाठी तो लांडगा झोपलेल्या माणसाजवळ जातो. लांडगा जवळ येताच तो माणूस उठतो.
लांडग्याच्या दिशेने काठी फेकतो . पण लांडग्याच्या राजाला ते माहित असते. तो त्याचा नेम चुकवतो आणि लांडगे पळून जातात.

Tuesday, 17 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७२

 

अहंकारी राजाला धडा - 


एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे.
     त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला.
    राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात.
     तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.

उपक्रम: कथा क्रमांक:७१

 अनमोल भेट

download%2B%252812%2529



एकदा एक राजा एका साधू कडे गेला आणि म्हणाला  माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?
ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा ह्या गोष्टी तुझ्या प्रजेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क आहे.
साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणांस मी भेट देऊ ? तुम्हीच सांगा.
तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करु शकतोस. अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते.

Monday, 16 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:७०

 अन राजाचे डोळे उघडले-

images%2B%252823%2529


 रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि,
" आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. 
शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले.
 राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू.
" ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते.
 त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले.
 राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.
मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. 
प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय?
 श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.

तात्पर्य-मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा. 

Sunday, 15 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक: ६९

 तेनालीराम जे वाक्चातुर्य-

images%2B%252822%2529
तेनालीराम जे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी.
मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्‍या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला.
 विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.
सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला; परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे ? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबारात हजर झाला, तेव्हा राजा कृष्णदेव रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, ‘‘तेनालीराम तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या, आता तेथील रहिवाशी निर्भयतेने राहू शकतात.’’
‘‘खरे आहे महाराज ! ’’ तेनालीराम म्हणाला, ‘‘सीमा क्षेत्रात आपला जयजयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, ‘‘अन्नदाता, शत्रुच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.’.
सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसर्‍याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले; पण ते नाटक कसले होते ? तर सीमांत रहीवाशांवर होणार्‍या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मधे-मधे विदुषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, ‘‘दया करा महाराज ! आम्हाला वाचवा ! शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे.’’ मंत्री, सेनापती, पंडीत, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलवून विचारले, ‘‘हे सर्व काय आहे ?’’ ‘‘मला काही माहित नाही, महाराज’’ तेनालीराम भोळेपणाचा आव आणून म्हणाला, ‘‘तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना’’!
महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली. तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बर्‍याचशा दरबार्‍यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजीवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेव राय म्हणाले, ‘‘राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही, तेनालीराम तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस.’

Saturday, 14 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:६८

 

खरा वेडा कोण - 

images%2B%252810%2529


एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. 
त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. 
त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई.
 वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई.
     हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. 
अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली.
     हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. 
    त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''

Friday, 13 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:६७

 

सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव - 

images%2B%252825%2529
एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.
    एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .
    सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.
   थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,"जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते". गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.

तात्पर्य - आति शहाणा त्याचा बैल रिकामा

Thursday, 12 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:६६

 

उंदराची टोपी -


20200228_140010           एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

            उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.'   

            शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !'
हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

उपदेश :  शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

Wednesday, 11 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:६५

 

हुशार  नावाडी - 


        एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला प्राणी पाळण्याचे खूप आवड होती. त्याच्याकडे शेळी, सिंह ,मेंढ्या , गाय अशाप्रकरे अनेक प्राणी होते. त्या शेतकऱ्याच्या घराजवळ एक नदी  होती.
     एके दिवशी शेतकरी शेतातून येत असताना त्याच्याकडे शेळी, सिंह आणि गवताची पेंढी असते परंतु त्या दिवशी त्या नदीला पूर आलेले असतो. त्या शेतकऱ्याला काही सुचत नाही कस जावे नदी पार करून हा प्रश्न त्याच्यासमोर पडतो. तेव्हा त्या शेतकऱ्याला एक नावाडी नाव घेऊन येताना दिसतो .
        तो त्या नावाड्याला बोलवून घेतो व सांगतो ह्या तीन गोष्टी आहेत. त्या तीन गोष्टी व्यवस्थित पोहोचवल्या तर मी तुला बक्षीस देईल. तो नावाडी विचार करू लागतो मग घेऊन जाण्यासाठी तयार होतो.
         जर नावाड्याने गवत पहिल्यांदा घेतलं तर सिंह शेळीला खाऊन  टाकेल. जर सिंहाला घेतलं तर शेळी गवत खाऊन टाकेल प्रश्न पडतो. नावाडी हुशार असल्यामुळे तो विचार करतो आणि कामाला सुरुवात करतो. नावाडी नावेत पहिल्यांदा शेळीला घेतो. तिला दुसऱ्या टोकाला सोडून येतो नंतर तो सिंहाला घेतो. सिंहाला दुसऱ्या टोकाला सोडतो आणि शेळीला  स्वतःबरोबर घेऊन परत या तीराला येतो.
       त्यानंतर तो शेळीला तिथेच ठेवतो आणि गवताची पेंढी दुसऱ्या टोकाला घेऊन जातो. सिंह आणि गवताची पेंढी एकत्रित ठेवतो. पुन्हा शेळीला आणण्यासाठी निघतो. शेतकरी खुश होतो. तो नावाड्याला बक्षीस देतो.


तात्पर्य - विचार करून काम केले तर अशक्य गोष्ट पण शक्य होते .

Tuesday, 10 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:६४

 

कष्टाचे फळ - 


                एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे.

                त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना  जवळ बोलावितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाणयांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा  व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.

             दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांना सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही .मग त्यांनी विचार केला की एवढे शेत कानाला आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले.

           त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरगोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात  जाऊन विकले व त्यामाना भरपूर धन मिळाले.

          गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा ते बोलले,'मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.'

तात्पर्य-  कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.

Monday, 9 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:६३

 

लोभाची शिक्षा - 


एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस