कंसाचा वध -
कंसाचा वध -
"मथुरेमध्ये कुस्त्यांचा मोठा उत्सव करण्याचं ठरलं. त्यासाठी मोठा मंडप करण्याच काम अक्रुराकडे दिल होत.
कंसाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोठा मंडप उभारला गेला. त्यामध्ये कुस्त्या पहायला येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची सोय केली होती. मंडपाच्या मध्यभागी कुस्त्यांसाठी एक मोठा हौद तयार केला गेला. त्या हौदाजवळ मथुरेचा राजा कंस याला बसण्यासाठी सुंदर सिंहासन ठेवलं होतं.
सगळी व्यवस्था झाल्यावर एके दिवशी अक्रुर एक सुंदर रथ घेऊन गोकुळात गेला. त्याने नंद व कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना कंसाचा निरोप सांगितला.
कृष्णाला नंद व गोप मंडळी मथुरेस पाठवण्यास तयार नव्हती. मग कृष्णाने सर्वांची समजूत घालून बलरामासह मथुरेस जाण्याचे ठरविले.
यशोदा, नंद व इतर गोपगोपींना कृष्ण जाणार म्हणून दुःख झाल. पण कृष्णाचा निश्चय ठाम होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण व बलराम अक्रुरासह मथुरेस जाण्यास निघाले.
कृष्णाला रस्त्यात देखील मथुरेस जाऊ नये म्हणून गोपगोपींनी विनवणी केली, परंतु कृष्णाने त्यांची समजूत काढली व त्यांना परत गोकुळात जाण्यास सांगितलं.
मथुरेत आल्यावर कृष्ण व बलराम यांच्यासाठी एक मोठा वाडा सजवून तयार ठेवला होता.
कंसाने इकडे आपल्या दरबारातील मुख्य मल्ल चाणूर व मुष्टिक यांना बोलवून सांगितलं की, कृष्ण व बलराम यांना काहीही करून मारून टाका. ते दोघेही लहान मुल आहेत म्हणून बेसावध राहू नका.
कंसाचे एवढयावरही समाधान झाले नाही, तर त्याने आपल्या हत्तीच्या माहुताला बोलावून सांगितलं की, कृष्ण मंडपात येण्यापूर्वी हत्ती दरवाजात उभा ठेव आणि कृष्ण दरवाजात येताच हत्तीला त्याच्या अंगावर सोडून दे.
दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल सुरू झाली. कुस्त्या पाहण्यास मथुरेतील हजारो लोक जमले होते. कृष्ण व बलराम रथात बसून मंडपाजवळ आले तेव्हा ते दोघेही फारच सुंदर दिसत होते. ते दोघे मंडपाजवळ येताच हत्तीने त्यांच्यावर धाव घेतली. कृष्णाने न घाबरता आपले दंड थोपटले व तो हत्तीच्या पोटाखाली शिरला. हत्तीच्या पोटावर त्याने ठोसे मारण्यास सुरूवात केली.
त्यामुळे हत्ती बेजार झाला व कृष्णाला शोधण्यासाठी गुडघे टेकून आपल्या दोन पायांमध्ये त्याने सोंड घातली. त्याबरोबर कृष्ण लगेच बाहेर आला व त्याने हत्तीचे दात खूप जोरानं दाबले. तेव्हा त्याचा एक दात मोडला. कृष्णाने तो मोडलेला दात घेऊन हत्तीच्या कपाळावर जोरदार फटके दिले. त्यामुळे तो हत्ती शेवटी मरण पावला.
ते बघताच कंस मनातून खूपच घाबरला. इकडे हौदामध्ये कुस्त्या सुरू होत्या, परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सर्वांच लक्ष महापराक्रमी कृष्णाकडे होतं. कृष्ण व बलराम मंडपात येताच चाणुर व मुष्टिक हे दोघं मल्ल हौदात उतरले.
त्या दोघांनी आपले दंड थोपटून आपणाबरोबर कुस्ती करण्यास कोणी तयार आहे काय? अस जमलेल्या मल्लांस विचारल, पण कोणीही तयार नव्हते.
तेवढयात बलराम व कृष्ण हौदात उतरले. त्यांची चाणुर व मुष्टिक यांच्याबरोबर कुस्ती सुरू झाली.
त्यांची कुस्ती खूप वेळ चालू होती. त्यानंतर बलरामाने मुष्टिकाच्या छातीवर जोराचा गुद्दा मारला व तो तात्काळ खाली पडला व मरण पावला. तसेच कृष्णाने चाणुरास उचलून फिरवलं व जमीनीवर आपटलं व तो मरण पावला.
कंस मात्र हा सर्व प्रकार बघून खूपच घाबरला, व त्याचे हातपाय थरथर कापायला लागले.
जिथे कंस बसला होता तेथे कृष्ण आला व त्याने कंसाचे केस धरून त्याला सिंहासनावरून खाली ओढलं. कंस आधीच घाबरून गेलेला असल्यामुळे जमीनीवर आदळताच त्याचा मृत्यू झाला.
कंसाच्या मृत्यूमुळे मथुरेच्या प्रजाजनांना फार आनंद झाला. श्रीकृष्णाने मथुरेच राज्य परत उग्रसेनाला दिले.
No comments:
Post a Comment