Monday, 7 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९२

 कृष्ण व गोवर्धन - 


20200325_003327


कृष्ण व गोवर्धन - 

"पावसाळा संपला आणि शरदऋतू सुरू झाला होता. दरवर्षीप्रमाणे गोपगोपींनी इंद्राचा उत्सव करण्याची तयारी सुरू केली.
कृष्णाने विचारले, “तुम्ही इंद्राचा हा उत्सव कशासाठी करता?” तेव्हा एक म्हातारा म्हणाला, “कृष्णा, इंद्रदेव हा पाऊस पाडतो. त्यामुळे पिके येतात व भरपूर हिरवं गवत उगवते. ते गवत गुर खातात व त्यावर गुरं पोसतात आणि दूध देतात. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल. अन्नपाण्याशिवाय सर्व लोकांचे हाल होतील. त्यासाठी वेळेवर पाऊस पडावा म्हणून इंद्रदेवांना आपण संतुष्ट केले पाहिजे; आणि त्यासाठी हा उत्सव आहे.”
कुष्णाला हि गोष्ट पटली नाही. तो म्हणाला, “हे बरोबर नाही, कारण आपल सगळं जीवन डोंगर-दऱ्या आणि गुर यावरच अवलंबून आहे. पलीकडचा जो गोवर्धन पर्वत आहे, तो किती चित्रविचित्र रंगाच्या पक्षांनी शोभून दिसत आहे. त्यावरचे मोठे वृक्ष फळांफुलांनी बहरून गेले आहेत. हिरवीगार कुरणं किती सुंदर दिसत आहे. म्हणून आपण सर्वांनी हया गोवर्धन पर्वताचा आणि गाईवासरांचा उत्सव करू या.”
कृष्णाचे हे बोलणे सर्वांना पटले.
त्यांनी सर्वांनी गाईवासरांना वेगवेगळया फुलांनी सजवून त्यांच्यासह सर्वांनी गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली आणि मोठा उत्सव केला.
सगळयांना आनंद झाला. परंतु इंद्राला हे काहीही आवडले नाही. आपला उत्सव या गोपांनी केला नाही म्हणून त्याला राग आला व त्याने जोराचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली.
हे बघून सगळे गोप घाबरले. कृष्णाने सर्वांना धीर दिला. त्याने गोवर्धन पर्वत उचलला व आपल्या करंगळीवर तोलून धरला. सतत सात दिवस पाऊस जोरदार पडला, परंतु गोपांना गोवर्धनच्या छपराखाली असल्यामुळे त्याचा काही त्रास झाला नाही.
इंद्र शेवटी कंटाळला आणि पाऊस थांबला. सगळेजण कृष्णासह परत गोकुळात आले.
तेव्हापासून कृष्णाला सर्वजण गोवर्धन-गिरिधारी असं म्हणू लागले. त्या सगळयांची कृष्णावरची भक्ती अधिकच वाढली.

No comments:

Post a Comment