कालियाचा पराभव -
कालियाचा पराभव -
"कृष्ण व बलराम थोडे मोठे झाले होते. ते दररोज गाईवासरांना घेऊन सवंगडयांबरोबर रानात जात. तेथे गेल्यावर कुस्त्या खेळाव्या, गळयात फुलांचे हार व डोक्यावर मोरपिसांचे मुकुट घालून मुरलीच्या नादात नाचावे व मौज करावी, हा जणू त्यांचा नित्यक्रमच होता.
गोपांच्या या वस्तीपासून एका कोसाच्या अंतरावर यमुना नदीत एक खोल पाण्याचा डोह होता. या डोहामध्ये एक कालिया नावाचा भयंकर काळा सर्प रहात असे. त्या सर्पाला सात फणा होत्या. त्याच्या विषामुळे त्या डोहातील पाणी अत्यंत विषारी बनलं होतं. कालियाच्या भीतीने त्या डोहाच्या जवळ पशू-पक्षी, किंवा इतर माणसं फिरकत नसे. त्यामुळे त्या भागात भयंकर रान माजल होत.
कृष्णाने ठरविले की, या सर्पाचा आपण नाश करायचा व तेथील पाणी शुध्द करायचं आणि सर्वांची भीती नाहीशी करायची.
एके दिवशी कृष्ण त्याच्या सवंगडयांची नजर चुकवून त्या डोहाजवळ गेला व तेथे असलेल्या एका कदंबाच्या झाडावर चढून त्याने आपले दंड थोपटले, जोरात एक आरोळी ठोकून डोहात उडी घेतली. डोहातील पाणी त्याबरोबर चारी बाजूस उसळलं.
पाणी उसळलेलं बघून कालिया संतापला व पाण्यावर आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो आपल्या सातही फणांतून सगळीकडे विष पसरीत होता.
कालियाने कृष्णाला घट्ट विळखा घातला व त्याला चावण्यासाठी प्रयत्न करू लागला तेव्हा कृष्णाने त्याची मान घट्ट आवळून धरली.
इकडे कृष्ण कुठेही दिसत नाही हे बघून त्याचे सवंगडी तेथे आले. व समोर दिसणारे भयंकर दृश्य पाहून ते घाबरून गेले, आणि अहो, कोणीतरी आमच्या कृष्णाला वाचवा, असे ओरडत ते गोकुळाकडे धावले.
त्यांचे ते ओरडणे ऐकून सगळे गोकुळ यमुनेच्या त्या डोहावर जमा झालं. तो प्रकार पाहून सर्वजण खूप घाबरून गेले होते. यशोदा तर ते बघून जोरात आक्रोश करू लागली.
कृष्णाने मातेचा तो शोक पाहून कालियाचं तोंड अधिकच जोरानं दाबलं. तेव्हा कालिया घाबरला आणि त्याचे कृष्णाभोवती घातलेले विळखे सैल झाले. मग कृष्णाने त्याच्या मस्तकावर चढून नाचायला सुरूवात केली.
अखेरीस कालिया कृष्णाला शरण आला. तो यमुनेच्या डोहातून निघून गेला. कृष्ण नदीच्या काठावर आल्यावर यशोदेने त्याला घट्ट मिठी मारली व प्रेमाने जवळ घेतले.
ते बघून सर्वांनाच खूप आनंद झाला. नंतर सगळेजण गाणी म्हणत उत्साहाने कृष्णासह गोकुळात परत आले.
No comments:
Post a Comment