Friday, 16 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३९

 animals-2028364_960_720



एक शेतकऱ्याचा एक कोंबडा होता, त्यास एके दिवशी असे समजले की, ‘आज आपला धनी आपणास मारून खाणार.’ मग तो आपण शेतकर्‍याच्या हाती न सापडावे म्हणून इकडेतिकडे लपून बसू लागला.

आपल्या बरोबरीच्या कोंबडयांच्या माना कापताना आपल्या धन्यास त्याने पुष्कळ वेळा पाहिले होते व तेव्हापासून त्याला मोठी दहशत बसली होती. त्याला जवळ बोलावून त्याची मान कापावी, या हेतूने त्या शेतकऱ्याने पुष्कळ गोड शब्द बोलून व धान्य दाखवून त्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कोंबदा पूर्वीच सगळे जाणून असल्यामुळे, त्याच्या गोड बोलण्यास भुलून फसला नाही.

जवळच एका पिंजर्‍यात त्या शेतकर्‍याचा बहिरी ससाणा होता, त्याने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तो कोंबडयास म्हणतो, ‘अरे, तू किती मूर्ख आणि कृतघ्न आहेस ! आपल्या धन्याने मारलेली हाक ऐकल्याबरोबर त्याच्याजवळ जाऊन तो काय म्हणतो ते ऐकून घेणे हे तुझे कर्तव्य नाही काय ? या बाबतीत माझे वर्तन कसे आहे, हे लक्षात घे. मला दुसरी हाक मारण्याचा प्रसंग आपल्या धन्यास मी कधीही येऊ देत नाही, हे तू पाहिलेच आहेस.’

कोंबडा उत्तर करतो, ‘खरेच ! पण मजप्रमाणे तुझी मान सुरीने कापून, तुझ्या मांसाचे तुकडे तव्यावर भाजून खावे, या उद्देशाने जर धन्याने तुला जवळ बोलाविले, तर तू मजप्रमाणेच लपून बसशील, याबद्दल मला बिलकुल संशय वाटत नाही. ’

तात्पर्य: परिस्थितीप्रमाणे मनुष्याच्या वर्तनात बदल व्हावा हे साहजिकच आहे। 

Thursday, 15 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३८

 सिंहाचा जावई

download%2B%25283%2529


 एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं.
 मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' 

यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.'
 सिंहाने ते मान्य केले.
 त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले.
 सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.

तात्पर्य : आपल्या कुवतीबाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरली, तर स्वत:चाच नाश ओढवतो.

Wednesday, 14 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३७

 हुशार कोल्हा

images%2B%25281%2529


        एक जंगल होते तिथे सर्व प्राणी रहात होते. एके दिवशी जंगलाच्या मद्यभागी कोल्ह्यला एक मेलेला हत्ती दिसतो पण तो हत्तीच्या जाड कातडे असल्यामुळे  तुकडे करून खाऊ शकत नसतो.
       थोड्या वेळाने  तिथे सिंह येतो. कोल्हा  म्हणतो ,महाराज मी तुमच्या जेवणाचे रक्षण करत आहे. सिंह म्हणतो मी दुसर्यांनी शिकार केलेले प्राणी खात नाही. सिंह निघून जातो. कोल्ह्यला असा कोणीतरी हवा असतो की जो हत्तीच्या कातडयाचे तुकडे करू शकेल आणि त्यामुळे कोल्हा हत्तीचे मांस सहज खाऊ शकेल.
       लवकरच तिथे चित्ता येतो. कोल्हा म्हणतो, सिंहराजाने या हत्ती ला मारलेले आहे. तो त्याच कुटुंब आणण्यासाठी गेला आहे. तो पर्यंत खाऊन घे. 'चित्ता म्हणतो अरे पण ...! सिंह मला मारून टाकिल ना.. तेव्हा कोल्हा  म्हणाला तू जा आणि त्या हत्तीचे मांस खायला लाग.सिंह जवळ येताना दिसला कि मी तुला इशारा करीन
       चिता हतीच्या मांसावर तुटून पडतो. चिता मांस वरील कातडी फाडतो तेव्हा कोल्हा त्याला सिंह आल्याचा खोटा इशारा देतो  आणि चित्ता पळून जातो. कोल्हा  खाली बसतो आणि जेवणाचा आंनद लुटतो.


तात्पर्य- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

Tuesday, 13 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३६

 सिंह, लांडगा आणि कोल्हा


           जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते.

            लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला वाटते.’ हे भाषण ऐकून सिंहास कोल्हयाविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलावून आणण्यासाठी एका पशूस पाठविले. हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्यास म्हणतो, ‘काय रे, मी इतका आजारी असता माझ्या समाचारास तू मुळीच येत नाहीस, याचे कारण काय बरे ?’ कोल्हा उत्तर करतो, ‘महाराज, आपल्यासाठी एकदा चांगलासा वैदय मी पहात होतो.

         शेवटी कालच एका मोठया वैदयाची व माझी गाठ पडली; त्यास मी आपल्या प्रकृतीसंबंधीने विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरावयास घेतले असता, हा रोग बरा होईल; याशिवाय अन्य उपाय नाही.’ कोल्हयाचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातडयासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेतला.


तात्पर्य:- दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.

Monday, 12 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३५

 

प्रमाणिक लाकुडतोड्या


       ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो  दुपारी  लाकुडतोड्ण्यासाठी    नदीजवळ एक मोठ झाड  होते तेथे गेला. झाड  तोडत असतानाच  त्याची अचनक  कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो  गमावतो.

       त्याच्याजवळ  दुसरी   कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे  नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते , का रे ? का रडत आहेस तू ?' लाकूडतोड्या सारीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो.

      सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती लाकूडतोड्याला दाखवते.लाकुडतोड्या नम्रपणे  म्हणतो देवी, ' ही माझी कुऱ्हाड नाही.

       मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते.पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ' हे  देखील नाही '. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते.लाकुडतोड्या म्हणतो ' होय हीच माझी कुऱ्हाड आहे माता!'
   देवी म्हणते तुझा प्रामाणिक पणा मला आवडला' या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला.प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो.

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे.

Sunday, 11 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३४

 

उंची खिचडी


दिल्लीची जबरदस्त थंडी चराचराला गोठवुन टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलाला विचारलं, 'बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा एखादा माणूस शंभर मोहोरांसाठी त्या समोरच्या तलावात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून घेऊन, रात्र काढील काय रे?'

'कुणी सांगाव ? परिस्थितीनं गांजलेला पण प्रकृत्तीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईलसुध्दा.' बिरबल बोलून गेला. दुसऱ्याच दिवशी बिरबलाला असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहा त्याला म्हणाला, 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता, उघड्या अंगान सबंध रात्र त्या तलावात, गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची, ही अट तुला मान्य आहे ना ?' त्या गरजू माणसान ती अट मान्य केली आणि बादशहाने ठेवलेल्या शिपायांच्या जागत्या पहाऱ्यात, त्या तलावातील बर्फ़ागार पाण्यात त्याने ती सबंध रात्र घालवली.

मग शंभर सुवर्ण मोहोरांचे इनाम घेण्याच्या आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता, बादशहानं त्याला विचारलं 'काय रे ? थंडी एवढी जबरदस्त पडली असताना, तू तलावाच्या गार गार पाण्यात सबंध रात्र कशी काय काढलीस ?'

तो मनुष्य म्हणाला, 'आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खिळवून, मी गेली रात्र कशीतरी घालवली' त्याच हे विधान ऎकून बादशहाचा हुजऱ्या म्हणाला, ' खाविंद, आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला, तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हा टक लावून बघत राहिल्याने, त्याची ऊब याला थोड्याफ़ार प्रमाणात का होईना-मिळाली. म्हणजे याने 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता तलावाच्या पाण्यात रात्र काढण्याची अट मोडलेली आहे. तेव्हा याला कसल्या शंभर सुवर्ण मोहोरा द्यायच्या ?' हुजऱ्याच्या या म्हणण्याला बादशहांनी दुजोरा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमुसल्या मनानं परत गेला.

मात्र त्याच दिवशी त्याने बिरबलाची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडा धीर धरायला सांगून, घरी जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला, तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून, बादशहानं दरबारी मंडळीकडे त्याची चौकशी केली; तेव्हा एकजण हसत हसत म्हणाला, 'खाविंद, आपल्या लाडक्या बिरबलाचं डोकं फ़िरलयं ! यमुनेकाठी २० हात उंचीचे तीन खांब अगदी एकमेकांजवळ पूरुन त्यावर त्याने खिचडीसाठी धान्याची एक हंडी ठेवलीय, आणि खाली जमीनीवर त्याने गवताची एक बारीकशी शेकोटी पेटवलीय !'

हा अजब प्रकार ऎकून आश्चर्यचकीत झालेला बादशहा स्वत: बिरबलाकडे गेला व त्याला म्हणाला, 'बिरबल, अरे, एरवी तू एवढी चतूर असताना, आज तुझ्या डोक्यात हे वेडकसं काय शिरलं ? अरे, जमिनीवर पेटवलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीची धग त्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या खिचडीच्या भांड्याला लागणं शक्य आहे का ?'

बिरबल म्हणाला, 'का नाही लागणार ? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील दिव्याच्या ज्योतीची धग जर अर्ध्या मैलावर असलेल्या त्या तलावातील माणसाला लागते, तर या शेकोटीची धग अवघ्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिचडीच्या हंडीला का लागू नये ?'

बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाच्या डोक्यात 'प्रकाश' पडला, आणि त्याने त्या तलावात रात्र काढलेल्या माणसाला बोलवून, त्याला शंभरऎवजी दोनशे सुवर्ण मोहरा दिल्या.

Saturday, 10 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३३

 

बासरीवाला मुलगा आणि गावकरी - 

     
 फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.
boy-2025731_960_720

    त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.

      ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.

     त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्यामागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात. आणि पाण्यात बुडून मरतात..

    बासरीवाला गावकर्‍यांना आपली बिदागी मागतो. मात्र, गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकर्‍यांची लबाडी कळून येते.

    तो म्हणतो ठिक आहे, आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.

      गावकर्‍यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.

उपदेश ः उपकार करणार्‍याशी कृतघ्न वागू नये.

Friday, 9 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३२

 अस्वल आणि दोन मित्र


 एकदा दोन चांगले मित्र जंगलातील एकाकी आणि धोकादायक वाटेवरून चालले होते. सूर्य मावळतीला जात असताना त्यांची भीती वाढली पण दोघांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले. अचानक त्यांना वाटेत अस्वल दिसले. एकजण पट्कन जवळच्या झाडाकडे पळाला आणि क्षणार्धात झाडावर चढला. दुसऱ्या मुलाला झाडावर चढता येत नव्हते म्हणून तो जमिनीवर मेल्याचे ढोंग घेऊन पडून राहिला.अस्वल जमिनीवर पडलेल्या मुलाजवळ आले, आणि त्याने त्याला डोक्यापाशी हुंगले. मुलगा मेला आहे असा विचार करून अस्वल त्याचा वाटेने निघून गेले.झाडावरचा मुलगा खाली उतरला. त्याने मित्राला विचारले,"अस्वलाने तुझा कानात काय सांगितले?"तो उत्तरला,"ज्या मित्रांना तुमची काळजी नसते अशा मित्रांवर विश्वास ठेऊ नका."

तात्पर्य: संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्रनैतिक मूल्यांसह असलेल्या ह्या लघुकथा, आपल्या मुलांना उत्तम धडे देतील तसेच तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवण्यास मदत करतील. जेव्हा आपण मुलांचे मनोरंजन करू इच्छित असाल तेव्हा नैतिक मूल्यांसह कथा हा नेहमीच चांगला पर्याय ठरेल.

Thursday, 8 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३१

 ओली विज़ार


 छोट्या अजयला शाळा आणि त्याचे शाळेतील मित्र खूप आवडत असत. एकदा शाळेत बाकावर बसलेला असताना अचानक त्याला काहीतरी ओलं लागलं आणि त्याला कळलं की त्याची विजार ओली झाली आहे. खजील झालेल्या अजयला काय करावे सुचेना, वर्गातले सगळे, त्याची ओली विजार पाहून टर उडवतील असे त्याला वाटले. मदतीची याचना करत तो बाकावर तसाच बसून राहिला.दीक्षा वर्गातल्या रोपांना पाणी घालण्यासाठी पाण्याने भरलेला तांब्या घेऊन जात होती, अचानक ती ठेचकाळली आणि तांब्यातले सगळे पाणी त्याच्या मांडीवर सांडले. सगळेजण अजयच्या मदतीसाठी धावले. बाईंनी दीक्षाला तंबी दिली आणि अजयला नवीन विजार दिली.शाळा सुटल्यावर अजयला दीक्षा बस मध्ये भेटली. त्याने विचारले,"तू हे सगळं हेतुपूर्वक केलंस नं?"दीक्षा म्हणाली,"माझी सुद्धा विजार एकदा ओली झाली होती".

*तात्पर्य: गरजवंतांना नेहमी मदत करावी.

Wednesday, 7 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:३०

 

मुंगी आणि टोळ

एकदा एका जंगलात मुंगी आणि टोळ रहात होते. टोळ दिवसभर आरामात पडून राहत असे तसेच त्याला गिटार वाजवायला आवडत असे. पण मुंगी दिवसभर कष्ट करायची. ती बगीचाच्या कानाकोपऱ्यातून अन्नाचे कण गोळा करून आणायची, तेव्हा टोळ मस्त आराम करत असायचा, गिटार वाजवत असायचा किंवा झोपलेला असायचा. टोळ दररोज मुंगीला विश्रांती घेण्यास सांगायचा पण मुंगी नकार देऊन कामाला लागत असे.लवकरच हिवाळा आला, दिवसरात्र थंडी पडू लागली. थंडीमुळे खूप तुरळक प्राणी बाहेर पडत असत. टोळ अन्न शोधात राहिला, आणि पूर्ण वेळ भुकेला राहिला, पण मुंगी कडे मात्र हिवाळा संपेपर्यंत निश्चिन्त पणे पुरेल इतका पुरेसा अन्नसाठा होता.


तात्पर्य: तारुण्यात कष्ट करा म्हणजे म्हातारपणात पश्चातापाची वेळ येणार नाही.

Tuesday, 6 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२९

 

कोल्हा आणि द्राक्ष

एकदा एक कोल्हा खूप भुकेला होता म्हणून तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याने सगळीकडे शोधले पण खाण्याजोगे त्याला काहीच मिळाले नाही. शेवटी भुकेल्या पोटी तो एका शेताच्या बांधावर आला. बांधावर अगदी उंचावर, त्याने आधी कधीही बघितली नव्हती अशी मोठी आणि रसाळ द्राक्षे दिसली. गर्द जांभळ्या रंगावरून कोल्ह्याला समजले की द्राक्षे खाण्यासाठी तयार आहेत.द्राक्षे तोंडात पकडण्यासाठी कोल्ह्याने हवेत उंच उडी मारली पण नेम चुकला. त्याने पुनःपुन्हा प्रयत्न केला पण नेम चुकला. त्याने पुन्हा काही वेळ प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी नेम चुकला. शेवटी कोल्ह्याने घरी जायचं ठरवलं आणि मनात बराच वेळ पुटपुटत राहिला,"मला खात्री आहे की द्राक्ष आंबटच असणार"

तात्पर्य: जे आपल्याला मिळत नाही त्याचा तिरस्कार करणे खूप सोपे आहे.

Monday, 5 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२८

 

दुधाचा पेला


एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला अचानक खूप भूक लागली. त्याला माहित होते की आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकुळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात जेवण मागू लागला. शेवटी एका मुलीने त्याला दुधाचा मोठा ग्लास दिला. जेव्हा हरी पैसे देऊ लागला तेव्हा तिने ते नाकारले आणि त्याला परत पाठवले.बऱ्याच वर्षांनंतर, ही मुलगी जी आता पौढा झाली होती, आजारी पडली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवूनही तिच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. शेवटी ती शहरातल्या नामवंत डॉक्टर सोबत, मोठ्या इस्पितळात गेली. डॉक्टरांनी काही महिने तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. ती खूप आनंदून गेली पण बिलाचे पैसे भरता येणार नाही ह्या विचाराने मनातून धास्तावली.जेव्हा हॉस्पिटलकडून तिच्या हातात बिलाचा लिफाफा आला तेव्हा तिने तो उघडला त्यावर लिहिलेली अक्षरे होती "रक्कम मिळाली,एका दुधाच्या पेल्यातूनदुधाचा पेला


 एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला अचानक खूप भूक लागली. त्याला माहित होते की आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकुळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात जेवण मागू लागला. शेवटी एका मुलीने त्याला दुधाचा मोठा ग्लास दिला. जेव्हा हरी पैसे देऊ लागला तेव्हा तिने ते नाकारले आणि त्याला परत पाठवले.बऱ्याच वर्षांनंतर, ही मुलगी जी आता पौढा झाली होती, आजारी पडली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवूनही तिच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. शेवटी ती शहरातल्या नामवंत डॉक्टर सोबत, मोठ्या इस्पितळात गेली. डॉक्टरांनी काही महिने तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. ती खूप आनंदून गेली पण बिलाचे पैसे भरता येणार नाही ह्या विचाराने मनातून धास्तावली.जेव्हा हॉस्पिटलकडून तिच्या हातात बिलाचा लिफाफा आला तेव्हा तिने तो उघडला त्यावर लिहिलेली अक्षरे होती "रक्कम मिळाली,एका दुधाच्या पेल्यातून!"

"तात्पर्य: चांगले काम कधीच वाया जात नाही.

Saturday, 3 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२७

 

लाकडाची मोळी

एकदा एका गावात तीन शेतकरी होते. तिघांच्याही शेतातील पिके सुकून गेली होती आणि त्यांना विषाणूंची लागण झाली होती. दररोज ते तिघेही पीक सुधारण्यासाठी नवनवीन उपाय शोधत होते. पहिल्याने बुजगावणं लावून पाहिलं, दुसऱयाने कीटकनाशके वापरली आणि तिसऱ्याने शेताभोवती कुंपण घातले.एक दिवस गावाचे सरपंच आले आणि त्यांनी तिन्ही शेतकऱ्यांना बोलावले. त्यांनी प्रत्येकाला लाकडाची एक काठी दिली आणि मोडण्यास सांगितली. शेतकरी ती सहज मोडू शकले. मग त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाकडांची मोळी दिली आणि तोडण्यास सांगितली. ह्या वेळेला त्यांना खूप संघर्ष करावा लागला.सरपंच म्हणाले," एकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र केले तर आपण जास्त ताकदवान असतो.” शेतकऱ्यांनी त्यांची साधने एकत्र केली आणि कीटकांपासून सुटका करून घेतली.


तात्पर्य: एकी हेच बळ

उपक्रम: कथा क्रमांक:२६

 

स्फटिकाचा चेंडू

नासिरला त्याच्या बागेतल्या वडाच्या झाडामागे एक स्फटिकाचा चेंडू सापडला. जेव्हा झाडाने त्याला सांगितले की हा चेंडू तुझी मनोकामना पूर्ण करेल तेव्हा नासीर ने खूप विचार केला पण त्याला काय मागावं हे सुचलं नाही. त्यामुळे त्याने तो स्फटिकाचा चेंडू पिशवीत ठेवला, आणि मनोकामना सुचण्याची वाट बघण्याचे ठरवले. दिवसामागून दिवस गेले पण त्याने मनातली इच्छा मागितली नाही, पण त्याच्या एका चांगल्या मित्राने नासिरला स्फटिकाच्या चेंडूकडे पाहताना पाहिलं. त्याने तो नासीर कडून चोरला आणि गावातल्या सगळ्यांना दाखवला. त्या सगळ्यांनी सोने आणि राजवाडे मागितले. पण प्रत्येक जण एकच इच्छा मागू शकत होता.आता सगळ्यांकडे फक्त सोने आणि आलिशान राजवाड्यांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. सगळेजण उदास झाले आणि त्यांनी नासिरकडे मदत मागायचे ठरवले.नासिरने मनोकामना व्यक्त केली की, गावकऱ्यांनी लोभीपणापायी जे गमावलं ते पूर्ववत होऊदे. राजमहाल आणि सोने गायब झाले आणि सगळे गावकरी अधिसारखेच आनंदी आणि समाधानी झाले.


तात्पर्य: पैसे आणि संपत्ती मधून आनंद मिळत नाही.

Friday, 2 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२५

 

एका पेन्सिलीची गोष्ट


राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली.विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला "माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही."आजीने समजावले," तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे, ती पण धार लावून घेण्याचा वेदनादायी अनुभव घेते, अगदी तसाच जसा तू तुझा परीक्षेत खराब कामगिरी केल्याचा घेतला आहेस! तरीही ती तुला चांगला विद्यार्थी घडवण्यास मदत करणार आहे. ज्याप्रमाणे हे पेन्सिल च्या आतून येते त्याप्रमाणे तुलाही अडथळ्यांना पार करण्याचा बळ तुझ्यातच सापडेल. आणि शेवटी ज्याप्रमाणे पेन्सिल कुठलीही पृष्ठभागावर आपला ठसा उमटवते, त्याचप्रमाणे तुही जे काही करायला घेशील त्यावर तुझा ठसा राहील.”राजला लगेच बरं वाटलं आणि त्याने स्वतःला वचन दिले की तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल.


तात्पर्य: आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता असते.

Thursday, 1 October 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२४

 गर्विष्ठ गुलाब


 एकदा एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता.एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,"मला पण पाणी मिळेल का?" दयाळू कॅक्टस लगेच "हो" म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्याला तोंड दिले.

तात्पर्य: कोणत्याही व्यक्तीविषयी त्याच्या दिसण्यावरून मत बनवू नका.

Wednesday, 30 September 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२३

 २३. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती दार ठोठावते


 ही गोष्ट, वेगवेगळे लोक, प्रतिकूल परिस्थीशी कसा वेगवेगळ्या प्रकारे सामना करतात हे सांगते. आशाच्या वडिलांनी एक अंडे, एक बटाटा आणि काही चहाची पाने, वेगवेगळ्या भांड्यांमध्ये उकळत्या पाण्यात ठेवली. त्यांनी आशाला १० मिनिटांसाठी भांड्यांकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. १० मिनिटांनंतर त्यांनी आशाला अंडे आणि बटाट्याचे साल काढण्यास सांगितले आणि चहा गाळून घेण्यास सांगितले. आशा विचारात पडली.तिचे वडील म्हणाले," या तीनही गोष्टी एकाच परिस्थितीत होत्या, पण बघ प्रत्येकाने परिस्थितीला किती वेगवेगळा प्रतिसाद दिला! बटाटा आता मऊ आहे, अंडे टणक आहे आणि चहाने तर पाण्याचा रंगच बदलला. आपण पण ह्या तीनही गोष्टींसारखे आहोत. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते, आपण अगदी असाच प्रतिसाद देतो".आता मला सांग,"तू अंडे आहेस, बटाटा आहेस की चहाची पाने?

*"तात्पर्य: परिस्थितीशी कसा सामना करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.

Monday, 28 September 2020

उपक्रम: कथा क्रमांक:२२

 ५. गवळण आणि तिच्या घागरी


 राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरीं मध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार ती करू लागली." जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबड्या विकत घेईन."तिने विचार केला, "कोंबड्या अंडी घालतील आणि मला अजून कोंबड्या मिळतील, त्या सगळ्या कोंबड्या अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन, गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील.ते मला विचारतील, "तुला पोल्ट्री फार्म विकायचे आहे का?" पण मी डोकं असं हलवून नकार देईन असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली.

तात्पर्य: पेरल्याशिवाय उगवणार नाही.

उपक्रम: कथा क्रमांक:२१

 

४. सोनेरी स्पर्श


ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली. परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून, त्याने परीला मदतीच्या बदल्यात एक वर मागितला. तो म्हणाला "मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोन्यात रूपांतर झालं पाहिजे”. त्याची ही इच्छा कृतज्ञ परीने मान्य केली.लोभी मनुष्य त्याला मिळालेल्या नवीन वराविषयी, आपल्या मुलीला आणि बायकोला सांगण्यासाठी घराकडे धावला. सगळा वेळ दगड, गोट्यांना स्पर्श करून सोन्यात रूपांतर करीत राहिला. तो घरी आला तेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे धावत येऊन त्याला बिलगली. तो तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकला, मुलीला त्याचा स्पर्श होताच मुलीचे रूपांतर सोनेरी पुतळ्यात झाले. त्याला त्याची चूक लक्षात आली आणि नंतर तो मनुष्य, परीने दिलेला वर मागे घेण्यासाठी तिला शोधू लागला.


तात्पर्य: लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो.

उपक्रम: कथा क्रमांक:२०

 

३."लांडगा आला रे आला" ओरडणारा मुलगा


एकदा एका मेंढपाळाने आपल्या मुलाला सांगितले की "आता तू मोठा झाला आहेस, मेंढ्यांकडे आता तू लक्ष देत जा"मेंढ्या धष्टपुष्ट आणि जाड लोकर देण्याजोगत्या होण्यासाठी, मेंढपाळाच्या मुलाला दररोज मेंढ्या माळरानावर चरायला घेऊन जाव्या लागत असत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागत असे. त्याला खेळायला खूप आवडायचे, आणि मेंढ्याकडे लक्ष देण्याचे काम त्याला कंटाळवाणे वाटायचे. तेव्हा त्याने मजा करायचे ठरवले.तो जोरात ओरडला ," लांडगा आला रे आला !" लांडग्याने मेंढया खाऊन टाकू नये म्हणून सगळे गावकरी हातात दगड घेऊन धावत आले. जेव्हा त्यांनी पहिले की तिथे लांडगा नव्हता, तेव्हा सगळे गावकरी मुलाने फसवल्यामुळे चिडून तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मुलगा पुन्हा ओरडला, "लांडगा आला रे आला !" आणि लांडग्याला हाकलण्यासाठी गावकरी पुन्हा धावून गेले. आपण कशी दहशत निर्माण केली हे बघून मुलगा हसला, गावकरी पुन्हा तिथून निघून गेले. काही खूप संतप्त झाले.तिसऱ्या दिवशी जेव्हा मुलगा टेकडीवर गेला, त्याने अचानक लांडग्याला मेंढ्यांवर हल्ला करताना पहिले. तो खूप मोठ्याने ओरडला, "लांडगा आला रे आला!". पण गावकऱ्यांनी विचार केला की तो पुन्हा आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि मेंढ्यांची सुटका करण्यासाठी कुणीही आले नाही. त्या दिवशी लहान मुलाने तीन मेंढ्या गमावल्या, केवळ तो तीन वेळा "लांडगा आला रे आला" असे ओरडल्यामुळेच.


तात्पर्य: लक्ष वेधण्यासाठी कथा तयार करू नका. जेव्हा आपल्याला खरोखर गरज असते तेव्हा कोणीही मदत करणार नाही.